गुरुवार, २३ मे, २०२४

दातृत्वाचा परिमळ - डॉ बालाजी आसेगावकर

 आजची तरुण पिढी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सतत मोबाईलमध्ये गुरफटलेली, कानात गाणे ऐकण्यासाठी काहीतरी घालून कायम स्वमग्न अवस्थेत एका वेगळ्याच विश्वात रमलेली मुले मुली आपल्याला आजूबाजूला दिसत असतात . त्यांचे स्वतः पलीकडे लक्ष नसते. आपण त्यांच्याशी संवाद साधला तरी बऱ्याचवेळेस तो तुटक आणि त्रोटक असतो. ध्येयानी पछाडलेली, सकारात्मक तरुणाई अभावानेच पाहायला मिळते. मागच्या चार पाच वर्षांपासून स्नेहसवालीच्या निमित्ताने वेगवेगळे सकारात्मक अनुभव येत असतात. अगदी सामान्य लोकांच्या मनाचा मोठेपणा कर्णालादेखील लाजवेल अश्या दिव्यत्वाची प्रचितीही बऱ्याच येत असते.

हे सर्व सांगायचे कारण म्हणजे नुकतीच अशीच एक उमद्या मनाची तरुण मुलगी केतकी निरंतर ही स्नेहसावलीला भेट द्यायला आली. तिने संस्था पहिली आणि तिच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्नेहसावली ह्या आमच्या सामाजिक संस्थेला अशी काही देणगी दिली की मी अगदी निशब्द झालो . आज तरुण मुले शिक्षणासाठी, नौकरीसाठी सत्ता धडपडत असतात. नौकरी मिळाली की प्रत्येकजण माझ्या पहिल्या पगारातून मी हे करीन, ते घेईन अशी स्वप्ने रंगवत असतो. काहीजण पहिला पगार देवाजवळ ठेवतात, आपले आई वडील भावंडे आप्तेष्ट आणि मित्रमंडळींसाठी भेटवस्तू घेतात. स्वतःची कित्येक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली एखादी ईच्छा पहिल्या पगारातून पूर्ण करतात. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनात पहिल्या पगाराला एक अनन्यसाधारण महत्व असते. पण ह्या पठ्ठीने मात्र पहिल्या पगाराची संपूर्ण रक्कम स्नेहसावलीला तर दिली आणि ती देतानासुद्धा इतक्या सहजपणे की आम्ही भारावूनच गेलो. तिच्याशी बोलल्यावर कळले की ती सॉफ्टवेअर अभियंता असून पुण्याला मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नुकतीच रुजू झाली होती आणि तिचा पहिला पगार जमा होताच तिने संपूर्ण पगाराचा धनादेश स्नेहसावलीतील गरजू आजी आजोबांच्या सुश्रुषेसाठी दिला. तिचा हा विचारच खूप अद्भूत होता. केतकीला हा दातृत्वाचा वारसा तिच्या वडिलांकडून आला असे सांगताना ती म्हणाली वडील त्यांच्या उत्पन्नच काही भाग कायम गरजूंना द्यायचे आणि तेही अश्या रीतीने की उजव्या हाताने दान देताना ते डाव्या हाताला पण समजले कळू द्यायचे नाही. नकळतपणे आई वडिलांचे हे संस्कार तिच्यावर बिंबवल्या गेल्यामुळे तिने वडिलांचाच कित्ता गिरवला. आई आणि वडिलांच्या वागण्याचे कसे नकळत संस्कार मुलांवर होत असतात ते ही लक्ष्यात आले. ह्या वयात समाजाप्रती असलेली तळमळ बघून मला म्हणावेसे वाटले "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता जावे, घेणाऱ्याने घेता घेता, देणाऱ्याचे उमदे मनही घ्यावे....."

तो राजहंस एक.... डॉ बालाजी आसेगावकर

 एखादे झाड असे वहिवाट सोडून जन्म घेते, कुठे डोंगराच्या वर, तर कपारीला. ते जगाच्या रोजच्या रहाटगाडग्यापासून दूर असते. त्याच्याकडे कोणाचे लक्षही नसते व तेथेच कुठंतरी वळचणीला आपली वाढ खुंटवून जगत असते, झुरत असते. त्याच्या नशीबाने येणाऱ्या एखाद्या वाटसरूची त्यावर नजर पडते. तो वाटसरू त्या झाडाची शक्ती ओळखतो. तो त्याला जातायेता खतपाणी घालतो आणि काही दिवसातच ते झाड वाढायला, बहरायला लागते. असंच माणसाच्या बाबतीत पण घडते का??

केशवचा जन्म अशाच एका अभागी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच हा मंदबुद्धी असा ठप्पा पडला. वडिलांची नौकरी गेलेली, घरात खाणारी तोंडे फार व मिळकत कमी. मग तर केशवची फारच आबाळ सुरू झाली. त्याची स्वतःची जगण्याची इच्छाच मरून गेली. तो घरी फक्त खायचा आणि रात्रंदिवस नुसता बसून राहायचा. हळूहळू चालण्याची शक्ती पण गेली. सर्वकाही जागेवरच. केशवच्या भावाला साधीशी नौकरी लागली. थोड्याच दिवसात वडीलही आजारी पडले आणि मग भावाने केशवला स्नेहसावलीत ठेवले. मला भावाशी बोलताना त्याचे केशवबद्दल खूप तळमळ जाणवली. स्नेहसावली सामाजिक संस्था असल्याने अगदीच नाममात्र दरात आम्ही केशवला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. केशवला तपासल्यावर मला लक्षात आलें की त्याला असा कोणताच दुर्धर आजार नाहीये की ज्यामुळे तो चालू शकत नाही. तो अतिशय नैराश्यात होता आणि शरीरापेक्षा मानसिक आजाराचा भाग जास्त होता. मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना हा चालू शकतो, चला तर हे आवाहन आपण स्वीकारू असे सांगितले. मनोविकारतज्ञाची मदत घेऊन नैराश्यासाठी उपचार सुरू केले आणि काही दिवसात केशवमध्ये बराच फरक जाणवला. दिवसभर पडून राहणार केशव आता बसू लागला, शून्यात हरवलेल्या नजरेत आता उत्सुकता, चमक दिसू लागली. लवकरच तो बोलायला लागला पण मी चालूच शकत नाही ह्या ठाम विश्वासामुळे तो चालण्याचे प्रयत्नसुद्धा करायला तयार नव्हता. आमच्या फिजिओथेरपीच्या मॅडमने त्याला बसल्याबसल्या सायकल चालवायचा व्यायाम सुरू केला. रोजचे त्याचे समुपदेशन, व्यायाम, सर्व परिचारक व केअर टेकर यांचे प्रोत्साहन आणि काय आश्चर्य ! आल्यापासून दोन महिन्यातच वॉकरच्या मदतीने केशवने हळूहळू पावले टाकायला सुरू केले. त्याच्या पहिल्यावहिल्या पावलांचे मोठे कौतुक आम्ही स्नेहसावलीत केले. आज हाच तो केशव, स्वतः स्वागत कक्षाचे काम जिम्मेदारीने सांभाळतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नोंद ठेवत, त्यांच्याशी संवाद साधतो ह्यावर विश्वास बसत नाही. खरंच माणसाच्या मनाला अशी निगा करणारी, फुलवणारी लोकं किती गरजेची असतात अन एकदा ती मिळाली की गदिमांच्या "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख" ह्या कवितेतील बदकाच्या पिल्लाप्रमाणे अवस्था होते. त्यांच्यातला त्या वेगळ्या पिल्लाला सर्वजण चिडवायचे की तू कुरूप आहेस, वेगळा आहेस. पण जेव्हा स्वतः त्या कुरूप पिल्लाला त्याच्यातील राजहंसाची जाणीव झाली तेव्हा त्याचे जीवनच बदलून गेले. तसेच काहीसे आमच्या केशवच्या बाबतीत घडले....

गौरव ज्येष्ठत्वाचा - डॉ बालाजी आसेगावकर

 १५ जुलैला स्नेहसावलीला ५ वर्षे पूर्ण झाली. आम्ही सुरू केलेल्या छोट्याश्या प्रयत्नांना काहीतरी आकार येण्याची लक्षणे दिसत आहेत. खरं म्हणजे एखाद्या संस्थेसाठी ५ वर्षे म्हणजे खूपच कमी कालावधी आहे. पण तरीही ह्या ५ वर्षात आम्ही कितीतरी परावलंबी व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण करू शकलो ह्याचे समाधान आहे. पाचवा वर्धापनदिन कसा साजरा करावा हा विचार सुरू असताना आजही जी ज्येष्ठ मंडळी समाजकार्यात हिरीरीने झोकून देऊन समाज उन्नतीसाठी तळमळीने निःस्वार्थपणे काम करीत आहेत त्यांचा गौरव करावा, कौतुक करावे अशी कल्पना सूचली.

लगेच अशा ज्येष्ठांची यादी तयार केली. आज ज्येष्ठत्व स्वतःच्या शारीरिक, मानसिक आरोग्याच्या व कौटुंबिक समस्यांच्या प्रश्नांमध्ये व्यस्त असताना आमच्या गौरवमूर्ती मात्र वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून भरीव कामगिरी करत आहेत‌ त्यांचा स्नेहसावलीच्या व्यासपीठावरून सत्कार करण्यासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसेवक नगर येथील स्नेहालयचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी व प्रसिद्ध उद्योजक श्री विवेक देशपांडे ह्यांनी येण्याचे तात्काळ मान्य केले. असा हा गौरव ज्येष्ठत्वाचा हा सोहळा मागच्या शनिवारी आय एम ए हॉल मध्ये असंख्य हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडला. ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ गिरीशजींचे व्याख्यान.... आपल्या सामाजिक जाणिवांचा, मनातील कळकळीचा, प्रामाणिक प्रयत्नांचा अविष्कार म्हणजे त्यांचे मार्गदर्शन होते. त्यांच्या भाषणाने सर्वजण भारावून गेले. श्री विवेकजी देशपांडे ह्यांचे अत्यंत मुद्देसूद विद्वत्ता प्रचूर भाषण खूप प्रभावी ठरले. काही सत्कारमूर्तींनी व्यक्त केलेल्या भावना सर्व उपस्थितांसाठी जीवनात सकारात्मकता कशी जपावी ह्यांची जणू मूर्तिमंत उदाहरणे स्पष्ट करीत * आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे,* *मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे"* ह्या ओळी सार्थ ठरवणारी होती. एकूणच खूप दर्जेदार कार्यक्रम आम्हाला ह्या निमित्ताने अनुभवता आला. ह्या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येकाचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. *डॉ बालाजी आसेगावकर व विश्वस्त मंडळी**स्नेहसावली केअर सेंटर छ. संभाजीनगर*